पुण्य वार्ता
संगमनेर ( प्रतिनिधी ) देशात जातीनिहाय जनगणना व्हावी ही काँग्रेस पक्षाची आधीपासूनची मागणी होती. आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक राज्यात आंदोलने सुरू आहेत. देशात कोणत्या जातीची किती लोक आहेत याची माहिती सरकारकडे असायला हवी. जेणेकरून त्यांना त्यांचा वाटा देता येईल आणि देशात बंधू भावाचे वातावरण वाढण्यास मदत होईल. केंद्र सरकारने नुकताच जातीनिहाय जनगणना करण्याचा घेतलेल्या निर्णय हे काँग्रेसचे यश असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी प्रदेशाध्यक्ष लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले असून या निर्णयाचे संगमनेर मध्ये युवक काँग्रेसकडून मोठ्या आनंदाने स्वागत करण्यात आले.
यशोधन कार्यालयाच्या मैदानावर युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसने जातीनिहाय जनगणनेचे जोरदार स्वागत केले. यावेळी नवनाथ आरगडे, निखिल पापडेजा, डॉ.विजय पवार,सचिन खेमनर,शरद पावबाके,प्रीतम साबळे, रमेश गपले, शुभम शिंदे,रमेश नेहे, वैष्णव मुर्तडक, शुभम काळे आदींसह युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी फटाके फोडून व राहुल गांधी जिंदाबाद, काँग्रेस पक्षाचा विजय असो, भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा विविध घोषणा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, काँग्रेसने कायम सर्व धर्म समभावाचा विचार जोपासला आहे. जातीनिहाय जनगणना व्हावी ही काँग्रेसची जुनी मागणी आहे. जातीनिहाय जनगणनेमुळे आरक्षणाचा लाभ दुर्लक्षित व वंचित घटकांना होणार आहे हा निर्णय म्हणजे काँग्रेसच्या सततच्या पाठपुराव्याचे यश असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, राजकारणामध्ये तत्वांचे आणि विचारांचे मतभेद असू शकतात परंतु व्यक्तीदोषाचे नको. ठाकरे बंधूंना पुरोगामी विचारांची परंपरा आहे. ते एकत्र आले तर हरकत नाही. देशाची लोकशाही आणि पुरोगामी विचार वाचवण्यासाठी त्यांनी एकत्र यावे असेही उद्धव व राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आपले मत व्यक्त केले.
यावेळी युवक कार्यकर्त्यांनी जातीनिहाय जनगणनेचे जोरदार स्वागत केले.
