पुन्य वार्ता
पाचोरा:
पाचोरा शहरात गेल्या काही महिन्यांपासून अवैध व्यवसाय, जुगार, दारू, मटका, आणि इतर गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असताना स्थानिक पत्रकारांनी या धंद्यांचा पर्दाफाश करण्यासाठी वेळोवेळी माध्यमांतून आवाज उठवला होता. मात्र, या सत्य वृत्तांकनाचा राग मनात धरून पोलीस आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांनी संगनमत करून, या पत्रकारांवर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
गुन्हा दाखल झालेल्या पत्रकारांमध्ये किशोरजी रायसाकडा यांच्यासह इतर तिघांचा समावेश आहे. हे सर्व पत्रकार स्थानिक गुन्हेगारी आणि पोलिसांच्या हातमिळवणीविरोधात सक्रिय होते. यामुळेच काही प्रस्थापित गुन्हेगारी मंडळी आणि पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मनात वैमनस्य निर्माण झाले आणि त्यांनी बदला घेण्यासाठी खोटा गुन्हा दाखल केला, असा गंभीर आरोप महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी केला आहे.
भोला पाटील उर्फ शेखर पाटील आणि अशोक पवार यांची संगनमत?
या प्रकरणात विशेष लक्षवेधी बाब म्हणजे, पत्रकारांवर खोटा गुन्हा दाखल करण्यामागे शेखर ऊर्फ भोला पाटील या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीचा थेट सहभाग आहे. भोला पाटील यानेच पोलिसांकडे खोटी तक्रार देऊन पत्रकारांविरुद्ध कारवाई केली. हे संपूर्ण प्रकरण पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या संगनमताने घडले असल्याचा आरोप पत्रकार संघाकडून करण्यात आला आहे.
“अशोक पवार सारख्यांना आम्ही उघड करण्यास वेळ लावणार नाही. ते कोणाच्या सांगण्यावर खोटे गुन्हे दाखल करत असतील, तर पत्रकार संघ गप्प बसणार नाही,” असा इशारा डॉ. आरोटे यांनी दिला.
पत्रकारांवरील अन्याय सहन केला जाणार नाही – डॉ. विश्वासराव आरोटे यांचा इशारा
पत्रकारांवर दाखल केलेला गुन्हा त्वरित मागे घेण्यात यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा ठाम इशारा पत्रकार संघाने दिला आहे. “पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्यांच्यावर खोटे आरोप लावणे म्हणजे लोकशाहीची गळचेपी आहे. पोलीस प्रशासन जर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या प्रभावाखाली काम करत असेल, तर हे अत्यंत धोकादायक आहे,” असेही डॉ. विश्वासराव आरोटे यांनी स्पष्ट केले.
त्यांनी पुढे सांगितले की, “आमच्या पत्रकार बांधवांनी अवैध धंद्यांविरोधात सडेतोड भूमिका घेतली आणि पंधरा दिवसांपूर्वी पाचोरा पोलिसांना निवेदन दिले होते. मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी त्याऐवजी गुन्हेगारांच्या दबावाला बळी पडून पत्रकारांवरच खोटे आरोप लावले. हा प्रकार आम्ही कदापिही सहन करणार नाही.”
मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, पोलीस अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाईची मागणी:
या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आणि संबंधित पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली असून, संबंधित पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची तात्काळ बदली करावी, भोला पाटीलवर कायदेशीर कारवाई करावी आणि पत्रकारांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
“आमच्या अंगात शेतकऱ्याचे रक्त आहे. जर वेळ आली तर आम्ही दोन हात करण्यासही मागे हटणार नाही,” असे म्हणत डॉ. विश्वासराव आरोटे यांनी आंदोलनाचे संकेत दिले आहेत.
सार्वजनिक संताप वाढतोय – पत्रकार संघ एकवटला:
या संपूर्ण प्रकारामुळे पाचोरा शहरात आणि जिल्हाभरात पत्रकारांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले असून, सर्व पत्रकार संघटना एकवटत आहेत. “पत्रकारांवर अन्याय झाल्यास, आम्ही संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन उभारू. अशोक पवार व भोला पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही,” असा निर्धार पत्रकार बांधवांनी व्यक्त केला.
न्यायासाठी लढा सुरु आहे. सत्य मूक होत नाही – आणि पत्रकाराच्या आवाजाला कुठलाही दबाव गप्प बसवू शकत नाही, हे लवकरच सिद्ध होईल!

