पुन्य वार्ता
अकोले ( दि. २३, प्रतिनिधी )
आपल्यामुळे कोणाचे तरी जीवन सुखी व आनंदी होत आहे ही भावना अतिशय उत्कट व आध्यात्मिक समाधान देणारी आहे. स्व. शेषराव गोडगे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत ही समाजासाठीही अनुकरणीय आणि प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन नगर विकास मंत्रालय सहसचिव विजय चौधरी यांनी केले.
रविवार, दि.२२ रोजी येथील अगस्ती मंदिर येथील गुरुकुलच्या ५४ हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत स्व. शेषराव गोडगे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गोडगे परिवार , आश्वी ता. संगमनेर यांच्यातर्फे करण्यात आली त्याप्रसंगी चौधरी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर अगस्ती देवस्थान ट्रस्ट समितीचे खजिनदार किसनशेठ लहामगे, विश्वस्त रामनाथ मुर्तडक , राधाकृष्ण आरोटे, वनवासी कल्याण आश्रमाचे रामदास सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते सुनील कडलग, शिक्षणशास्त्र महाविद्यालय संगमनेरच्या प्रा. मंगल गोडगे, उपक्रमशील शिक्षिका वृषाली कडलग, मंदा सोनवणे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी नवोदय विद्यालयात निवड झालेल्या आराध्य भोर या विद्यार्थ्यास विजय चौधरी यांनी परदेशी बनावटीचे घड्याळ भेट दिले.
आपल्या प्रास्तविक भाषणात आदित्य गोडगे यांनी कार्यक्रमागचा हेतू विषद केला. वृषाली कडलग यांनी आपल्या मनोगतात गरजू विद्यार्थ्यांना योग्य वेळी झालेली मदत त्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी दिशादर्शक ठरेल असे सांगितले.
आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात चौधरी पुढे म्हणाले की, आम्हीं शिक्षण घेतले तेंव्हा परिस्थिती खूप बिकट होती . पावसाळ्यात छत्री ऐवजी घोंगडी व शालेय दप्तरासाठी गोनीची पिशवी आम्ही वापरत असू. पायात चपला नसायच्या. आताही संघर्ष असला तरी भौतिक सुविधा उपलब्ध होत आहेत. अतिशय वेगवान इंटरनेटच्या माध्यमातून माहितीचा खजिना उपलब्ध होत आहे. शिक्षणामध्ये मोठे बदल होत आहेत. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढत असल्यामुळे, शिक्षण अधिक प्रभावी आणि सोपे होत आहे, मात्र या परिस्थीत विचलित न होता विद्यार्थ्यांनी इंटरनेटचा वापर करतांना चांगल्या गोष्टींसाठी करावा. जीवनाला आध्यात्मिक अधिष्ठान असेल तरच जीवन स्थिर होते, त्यासाठी अगस्ती देवस्थान संचलित गुरुकुल आश्रम दिशादर्शक ठरेल असेही त्यांनी सांगितले.
आपल्या भाषणात रामदास सोनवणे यांनी सहसचिव विजय चौधरी यांच्या यशोगाथेचा उल्लेख केला. प्रवाहाविरुद्ध संघर्ष करणारेच व्यक्तिमत्वच इतिहास निर्माण करतात असे सांगितले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गोकुळ आरोटे, अमित नाईकवाडी, आदित्य कडलग, धनश्री आरोटे, ऋतुजा आरोटे यांनी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वस्त रामनाथ मुर्तडक यांनी तर आभार प्रदर्शन गोकुळ आरोटे यांनी केले.
