पुन्य वार्ता
ब्राम्हणवाडा (प्रतिनिधी)
सह्याद्री विद्यालय, ब्राम्हणवाडा येथे दिनांक ८ जून रोजी बॅच १९९९ च्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने एक आगळावेगळा आणि हृदयस्पर्शी स्नेहमेळावा तसेच शिक्षक कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात आणि सन्मानपूर्वक पार पडला. जवळपास ८० माजी विद्यार्थी आणि १६ शिक्षक यांची उपस्थिती कार्यक्रमात नोंदवली गेली.
कार्यक्रमासाठी विद्यालयाजवळील वसंत लीला सभागृह निवडण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी पारंपरिक लेझीम नृत्याच्या गजरात आपल्या गुरुजनांना सन्मानपूर्वक सभागृहाच्या गेटपर्यंत आणले. या अनोख्या स्वागताने संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे ब्राम्हणवाडा गावाचे वीरपुत्र शहीद जवान संदीप पांडुरंग गायकर यांचे वीर माता-पिता, पत्नी आणि सुपुत्र यांच्या उपस्थितीत झालेले सन्माननीय आगमन. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाद्वारे कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर राष्ट्रगीत, ‘खरा तो एकची धर्म’ ही प्रार्थना, तसेच महाराष्ट्र गीत प्रस्तुत करून पारंपरिक परिपाठ घेण्यात आला, ज्याने सर्व उपस्थितांना शाळेच्या आठवणीत रंगवले.
शाळेतील दिवंगत गुरुजन व वर्गमित्र तसेच देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद संदीप गायकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या वीर मातापिता, पत्नी व पुत्र यांना खास भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविलेले श्री उगले सर यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशाचा आढावा घेताना त्यांनी “हा आमचा सच्चा गौरव आहे,” असे उद्गार काढले.
कार्यक्रमात सहभागी सर्व शिक्षकांचा औक्षण करून त्यांचा सत्कार करण्यात आला. गुरुपूजनाचा अनोखा सोहळा विद्यार्थ्यांच्या नतमस्तक कृतज्ञतेचा प्रतीक ठरला. अनेक शिक्षकांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिला व पुन्हा एकदा भेटण्यासाठी आग्रह व्यक्त केला.
विशेष म्हणजे, श्री अजित अर्जुन आरोटे यांची नायब सुभेदार पदावरून सुभेदार पदावर झालेली पदोन्नती लक्षात घेऊन त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन श्री अजित आरोटे, श्री गणेश गायकर, श्री भास्कर आरोटे, श्री मयुर हांडे, श्री दीपक गायकर आणि श्री इकबाल पटेल यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केले. सूत्रसंचालनाची जबाबदारी अत्यंत समर्थपणे गणेश गायकर व संगीता आरोटे यांनी पार पाडली.
कार्यक्रमाच्या अखेरीस श्री अजित आरोटे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, गुरुजन व माजी विद्यार्थ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. शेवटी स्नेहभोजनाचा आस्वाद घेत सर्वांनी २६ वर्षांनंतर पुन्हा एकदा शाळेच्या आठवणीत रममाण होत, “पुन्हा एकत्र येऊया,” हा निर्धार करत आनंदाने परतीचा मार्ग धरला.
हा कार्यक्रम शाळेच्या इतिहासातील एक स्मरणीय क्षण ठरला असून, माजी विद्यार्थ्यांच्या कृतज्ञतेचा आणि संस्कृतीशीलतेचा एक आदर्श ठरतो.

