पुन्य वार्ता
अकोले (प्रतिनिधी) :
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई – अकोले शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत समाजभान जागवणारे विचार मांडले. या सोहळ्याला तालुक्यातील 90 माध्यमिक विद्यालये, 32 आश्रमशाळा, 12 उच्च माध्यमिक विद्यालये तसेच जिल्हाभरातील विविध शाळांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना आमंत्रित करून विद्यार्थ्यांसमोर प्रत्यक्ष आदर्श ठेवण्याचा प्रयत्न झाला. “कोणीतरी दाता पाहिजे, कोणीतरी जाता पाहिजे”, असे समाजाचे म्हणणे असताना आम्ही ‘नो एजंट थेट कनेक्शन’ या तत्वावर काम करत आहोत, असे सांगून डॉ. विश्वासराव आरोटे यांनी सामाजिक बांधिलकीचे भान जागवले.

डॉ. विश्वासराव आरोटे यांनी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या नानजीभाई खेमजीभाई ठक्कर ठाणावाला यांचे विशेष उल्लेख करून सांगितले की, “ज्यांनी देशभरात 70,000 मंदिरांचे उभारणी कार्य केले, अशा व्यक्तिमत्त्वाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.”
कार्यक्रमास अनिलजी राहणे सर, इन्फोसिस कंपनीचे ब्रांच मॅनेजर मंगेशजी लोखंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते किरणजी लोहरे, पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शर्माजी, दशरथजी चव्हाण, माने सर, ज्ञानेश्वर चंद महाराज, अध्यक्ष अशोकजी उगले, हरिभाऊ फापाळे, भाऊसाहेब वाकचौरे,दत्ता जाधव, जगन आहेर,शंकर संगारे, ललित मुतडक, यांच्यासह ग्रामीण व शहरी भागातील अनेक पत्रकार उपस्थित होते.

265 दिवस सामाजिक कार्यात समर्पित पत्रकार संघ:
डॉ. विश्वासराव आरोटे यांनी नमूद केले की, “संपूर्ण वर्षातील 265 दिवस आम्ही सामाजिक कामांमध्ये व्यस्त असतो. आपल्या भागातील विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत. एका वेगळ्या संस्थेमध्ये काम करताना त्यांनी माझ्याकडे अपेक्षा विचारली तेव्हा मी स्पष्ट सांगितले, ‘जे काही देशाल ते आमच्या भागाला द्या.’”
विद्यार्थ्यांना दिले शैक्षणिक व आरोग्य सेवांचे आश्वासन:
पत्रकार संघाच्या वतीने आंतर भारतीय रुरल एज्युकेशन या संस्थेमार्फत पत्रकारांच्या पाल्यांसाठी KG ते PG शिक्षणात २५% फी सवलत देण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. एसएमबीटी संस्थेशी संपर्क करून मोफत आरोग्य उपचार कसे मिळवता येतील यावरही संघ प्रयत्नशील आहे.
शिक्षकांचे योगदान अमूल्य – ‘माजी’ असा शब्द त्यांच्या बाबतीत वापरता येत नाही!
डॉ. विश्वासराव आरोटे यांनी आपल्या भाषणात शिक्षकांच्या भूमिकेवरही प्रकाश टाकला. “आपण आमदार, खासदार किंवा मंत्री माजी होऊ शकतो, पण शिक्षक कधीच माजी होत नाहीत. ते नेहमीच ‘माझे शिक्षक’ राहतात. पहिली ते दहावीपर्यंत घडणारी मैत्री खरी असते, आणि या काळात विद्यार्थ्यांना घडवणारे शिक्षक हेच खरे शिल्पकार असतात,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.

विद्यार्थ्यांना साहित्य देऊन गौरव – समाजासाठी प्रेरणास्थान:
गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करताना त्यांच्या प्रयत्नांना दाद देण्यासाठी शालेय साहित्य देऊन गौरवण्यात येते. हे साहित्य योग्य पद्धतीने त्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकार संघ सातत्याने प्रयत्नशील आहे.
उपस्थित मान्यवरांचा उल्लेख आणि कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन:
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची मेहनत आणि तालुक्याच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती महत्त्वाची ठरली. या सोहळ्याने केवळ विद्यार्थ्यांचाच नव्हे तर उपस्थित सर्वांच्याच मनामध्ये नवी उमेद, नवा विश्वास जागवला.

