पुन्य वार्ता
शिर्डी (प्रतिनिधी) – सामाजिक कार्यात अविरतपणे कार्यरत असलेल्या समाज कल्याण न्यास या संस्थेच्या २४ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत शिर्डी येथील साईपालखी निवारा केंद्रात संस्थेचा भव्य पदाधिकारी मेळावा पार पडला. या वेळी राज्यभरातून हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी, सामाजिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या ऐतिहासिक मेळाव्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते संस्थेच्या नवीन प्रांतिक कार्यकारिणीची घोषणा. शिवसेना (शिंदे गट) नेते व भिवंडी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रुपेश म्हात्रे यांची समाज कल्याण न्यासच्या प्रदेशाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
या वेळी पत्रकारिता आणि सामाजिक कार्यात अग्रणी भूमिका बजावणारे डॉ. विश्वासराव आरोटे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सरचिटणीस व दैनिक समर्थ गांवकरीचे संपादक यांची प्रदेश उपाध्यक्ष म्हणून तर अनुभवी नेतृत्वाचे प्रतीक असलेले नारायण मामा पाटील यांची प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
याशिवाय विविध जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या:
मुख्य पदाधिकारी नियुक्त्या:
स्वप्निल भोईर – महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष
योगेश बेनके – महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख
संजीवन म्हात्रे – महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते
डॉ. किशोर बळीराम पाटील – प्रदेश कार्यकारिणी सदस्य
सुधीर जावळे – उत्तर महाराष्ट्र शिक्षक सेना अध्यक्ष
संजय फुलसुंदर – उत्तर महाराष्ट्र शिक्षक सेना सचिव
डॉ. मनिलाल शिंपी – उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख
शंकर खारीक – कोकण विभाग प्रदेश अध्यक्ष
जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकारी:
ज्ञानेश्वर भोईर – ठाणे जिल्हा अध्यक्ष
विलास भोईर – ठाणे जिल्हा सचिव, शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष
प्रकाश देवळीकर – पालघर जिल्हा अध्यक्ष
मूलचंद भगत – नाशिक जिल्हा अध्यक्ष
फारुख शेख – बीड जिल्हा अध्यक्ष
समाधान पाटील – धुळे जिल्हा अध्यक्ष
महिला आघाडी पदाधिकारी:
सौ. नलिनी चौधरी – ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा
सौ. गायत्री महिंद्र पगार – नाशिक जिल्हा महिला अध्यक्षा
एड. शुभांगी निचिते – ठाणे महिला कार्याध्यक्ष
सौ. स्वाती कांबळे – भिवंडी शहर महिला जिल्हाध्यक्ष
सौ. नलिनीताई घरत – ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष
सौ. अंजलीताई चौधरी – पालघर जिल्हा महिला अध्यक्ष
या भव्य मेळाव्याचे अध्यक्षस्थान हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे यांनी भूषवले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की, “या संस्थेमधील पदे ही वैयक्तिक प्रतिष्ठेसाठी नव्हे, तर समाजाच्या सेवेचा संकल्प घेण्यासाठी आहेत. पदे लग्नपत्रिका किंवा इव्हेंटसाठी वापरणे अयोग्य आहे. समाजसेवा हेच या संस्थेचे ध्येय आहे आणि त्यासाठीच आपण एकत्र आलो आहोत.”
डॉ. सोन्या पाटील यांचा भावनिक संदेश:
संस्थेचे संस्थापक धर्मसेवक डॉ. सोन्या पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले,
“मला कुठलाही सत्कार नको, हार-तुरे, फलक नकोत. माझा वाढदिवस साजरा करायचा असेल, तर प्रत्येकाने आपल्या भागात गरजू विद्यार्थ्यांना पेन-वही द्यावी, अन्नदान करावे, सेवा करावी – हीच खरी अभिव्यक्ती आहे.”
त्यांनी “समाजसेवा हीच ईश्वर सेवा” हे ब्रीदवाक्य जपताना गेली २४ वर्षे एकही दिवस न थांबता कार्यरत राहिलेल्या संस्थेचा परिचय राज्यभराच्या कार्यकर्त्यांना दिला. या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी:
शैक्षणिक साहित्य वाटप:
दीपावळीपूर्वी आदिवासी भागांत मिठाई, साडी वाटप
आरोग्य शिबिरे:
ॲम्बुलन्स सुविधा
क्रीडा महोत्सवांचे आयोजन
साई पालखी यात्रा (भिवंडी ते शिर्डी)
असे अनेक उपक्रम राबवले जातात.
डॉ. विश्वासराव आरोटे यांचे प्रेरणादायी विचार:
डॉ. विश्वासराव आरोटे यांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे सांगितले की, “समाज कल्याण ही संस्था म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याची खरी मातृसंस्था आहे. या महान संस्थेच्या २४ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या पवित्र साईभूमीत, समाजसेवेच्या रथयात्रेत सहभागी होणाऱ्या आपणा सर्व कार्यकर्त्यांना मी मनापासून नमन करतो!
माझी आजची भूमिका ही केवळ प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नाही, तर या मातृसंस्थेचा एक जबाबदार शिलेदार म्हणून आहे. मी स्वतःला कधीच ‘पदाधिकारी’ मानत नाही, मी ‘कर्तव्याधिकारी’ आहे – आणि तुमच्यासारख्याच एका कार्यकर्त्याने आज ही व्यासपीठावर उभं केलंय.
समाज कल्याण: एक संस्थेपेक्षा अधिक – एक विचार, एक चळवळ!
‘समाज कल्याण’ ही संस्था म्हणजे केवळ एक पंजीकृत संस्था नाही – ती एक विचारधारा आहे, एक संस्कृती आहे. या संस्थेने गेल्या चोवीस वर्षांत दाखवलेला समाजसेवेचा प्रवास म्हणजे – पायाला चिखल लागला तरी चालेल, पण एखाद्या गरीबाच्या डोळ्यात आनंदाचं पाणी आलं पाहिजे – हाच या संस्थेचा हेतू राहिलाय.
या व्यासपीठावर येणाऱ्या प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवावी, या संस्थेची ओळख आपण निर्माण करायची नसते, आपल्या कार्यातून ही संस्था आपली ओळख निर्माण करते!
दुसऱ्याच्या तव्यावर पोळी भाजणं थांबवा!
आज काळ बदलला आहे. सोशल मीडियाच्या युगात काम कमी आणि जाहिरात जास्त झाली आहे. काही लोक दुसऱ्याच्या नावाचा वापर करून स्वतःला पुढे नेण्याचा प्रयत्न करतात.पण मी इथे आज स्पष्ट सांगतो:
दुसऱ्याच्या तव्यावर पोळी भाजणं सोडा!
स्वतःच्या परिसरात, आपल्या विभागात काम करा.
तुम्ही एखाद्या गरीब विद्यार्थ्याला वही दिलीत, एखाद्या शेतकऱ्याला मदत केलीत, एखाद्या आजारी माणसाला रक्त मिळवून दिलं – तर समाज तुमचं नाव घेईल, त्यासाठी बॅनर लागणार नाहीत!
ही संस्था म्हणजे पदासाठी नव्हे, कार्यासाठी आहे
ही संस्था कुणालाही राजकारणासाठी किंवा निवडणुकांसाठी वापरायची नाही.
“या संस्थेच्या माध्यमातून जर तुम्ही फक्त पद मिळवण्याचा विचार करत असाल, तर हे व्यासपीठ तुमच्यासाठी नाही. पण जर समाजासाठी काही करायचं ठरवलं असेल, तर ही संस्था तुमच्या पाठीशी अखंड उभी आहे.”
समाज कल्याण: आपल्या कामाचं व्यासपीठ:
आपण ज्या पदावर निवडून आलो आहोत, ती एक संधी आहे – ती ‘सोने’ करण्याची.
या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या जिल्ह्यात, तालुक्यात, गावात असे उपक्रम राबवा की लोक म्हणतील – ‘हो, हा कार्यकर्ता समाज कल्याणचा आहे, आणि तो खरोखर काम करतो!’
मित्रांनो,
पद म्हणजे केवळ एक नाव नाही, ती एक जबाबदारी आहे. आणि जबाबदारी निभावण्याची शक्ती तुमच्या नजरेत असली पाहिजे, तुमच्या कृतीत असली पाहिजे.
डॉ. विश्वासराव आरोटे यांनी सांगितले की, माझी अपेक्षा आणि विनंती आहे तुम्हाला:
- प्रत्येक कार्यकर्त्याने वर्षातून किमान तीन समाजोपयोगी उपक्रम राबवावेत.
- शाळकरी मुलांना वह्या, पेन, कपडे, पुस्तकं वाटावीत.
- मुलींच्या शिक्षणासाठी विशेष मोहिमा राबवा.
- आरोग्य शिबिरं, रक्तदान, नेत्रतपासणी यासाठी पुढाकार घ्या.
- कार्य करण्याआधी छायाचित्र काढू नका, आणि काम झाल्यानंतर फोटो आवश्यक वाटत असेल तर घ्या – पण कृतीला प्रथम स्थान द्या.
समाजसेवा हीच ईश्वरसेवा आहे – आणि ‘समाज कल्याण’ हीच खरी देवपूजा आहे असेही डॉ. विश्वासराव आरोटे म्हणाले.
कार्यक्रमाचे अन्य वैशिष्ट्ये:
कार्यक्रमाची सुरुवात साईबाबांच्या आरतीने व दीपप्रज्वलनाने झाली.
शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
संस्थेचे प्रमुख प्रवर्तक जे.के. पाटील यांनी आभारप्रदर्शन केले.
शेवटी सर्वांना स्नेहभोजन देण्यात आले.
समाज कल्याण न्यास ही केवळ संस्था नाही तर चळवळ आहे. माणसातील माणूसपण जागवणारी, समाजसेवा हीच ईश्वरसेवा मानणारी ही चळवळ आज नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून अधिक व्यापक होत आहे. नव्या कार्यकारिणीमुळे निश्चितच समाजकार्याला नवे बळ, दिशा आणि गती प्राप्त होईल, असा विश्वास सर्वसामान्य कार्यकर्त्यांत व्यक्त होत आहे.
