पुण्य वार्ता
एकदरे/प्रतिनिधी(बाजीराव भांगरे)-
अकोले तालुक्यातील समशेरपूर येथे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत एक महत्त्वपूर्ण जनजागृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.नैसर्गिक शेतीचे महत्त्व आणि फायदे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.कार्यक्रमाची सुरुवात सहाय्यक कृषी अधिकारी राघू पेढेकर यांच्या प्रास्ताविकाने झाली.तसेच मंडळ कृषी अधिकारी समशेरपूर राजेंद्र बिन्नर यांनी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाचे महत्त्व समजावून सांगितले.त्यांनी नैसर्गिक शेतीमुळे जमिनीचे आरोग्य कसे सुधारते,रासायनिक खतांचा वापर टाळून उत्पादन खर्च कसा कमी करता येतो आणि पर्यावरणाचे रक्षण कसे होते.असे बोलताना सांगितले.तसेच त्यांनी माती नमुने काढण्याविषयी शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केले ज्यामुळे जमिनीतील पोषक घटकांची माहिती मिळण्यास मदत होईल.उप कृषी अधिकारी साहेबराव वायळ यांनी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाची ओळख करून दिली आणि या योजनेचे महत्त्व समजावून सांगितले.त्यांनी जमीन आरोग्य पत्रिकेचे महत्त्व विशद केले, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या आरोग्याबाबत सविस्तर माहिती मिळू शकते आणि त्यानुसार ते योग्य उपाययोजना करू शकतात.
यावेळी उपस्थित सहाय्यक कृषि अधिकारी रविंद्र मांढवे,कृषी सखी दिपाली चौधरी,ग्रामपंचायत सदस्य दत्तू चौधरी,तसेच सी.आर.एफ.प्रियंका भरीतकर,यांनी विशेष परिश्रम घेतले.या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने बचत गटातील महिला आणि गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.
