पुण्य वार्ता
अकोले – अकोले तालुक्यातील कोतुळ येथील प्रयोगशील शेतकरी आणि कृषी तज्ञ श्री.सयाजीराव गोपाळराव पोखरकर यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत दिला जाणारा वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार नुकताच महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.मुंबईतील वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा संकुलात काल झालेल्या शानदार सोहळ्यात हे पुरस्कार वितरित करण्यात आले.यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार कृषिमंत्री ना.धनंजयजी मुंडे, आ.प्रकाश पाटील,कृषी विभागाच्या मुख्य सचिव श्रीमती.जयश्री भोज,कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे,कृषी संचालक कैलास मोते यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.यावेळी सन 2020 2021 2022 या तीन वर्षातील, कृषिरत्न,कृषिभूषण,शेतीनिष्ठ, शेतिमित्र,
युवा शेतकरी,जिजामाता कृषिभूषण,सेंद्रिय शेती कृषिभूषण,पद्मश्री विखे पाटील सेवा रत्न पुरस्कार व पीक स्पर्धा विजेत्यांचा सन्मान करण्यात आला.शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा बहुमान करताना आम्हाला विशेष आनंद होत असून शेतकऱ्यांच्या प्रति योग्य त्या सर्व सुविधा व योजना करण्यास आम्ही कटिबद्ध असल्याचे ना.धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. विज बिल माफी,शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्धता,पीएम किसान,नमो शेतकरी सन्मान,कांदा निर्यात,सोयाबीन तेलावरील निर्यात शुल्क कमी करण्याच्या बाबतीत राज्य सरकारने शेतकरी प्रमुख निर्णय घेतल्याने उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी सांगितले.शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून शेतकरी हिताला प्राधान्य देणारे महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य असल्याचे राज्यपाल सी.पी राधाकृष्णन म्हणाले.*
श्री.सयाजीराव पोखरकर यांनी शेती क्षेत्रातील तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक प्रयोग केले,आपल्या शेतात अनेक भाजीपाला,फुल पिके तसेच उसासारख्या नगदी पिकांचे उत्पादन ते घेत असतात कृषी विभागाचे संपर्क शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे.शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळावे,चर्चासत्रे,क्षेत्रभेटी,पथदर्शक प्रकल्प यामध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असतो.जॉर्डन व इस्रायल या देशांचा कृषी विषयक अभ्यास दौरा त्यांनी पूर्ण केलेला आहे.जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी व सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी जागेवरच ऊस पिकाचे पाचट कुजविणे,गांडूळ खताचा वापर करणे,पिकांचे आच्छादन करणे,ठिबक व तुषार सिंचनाचा वापर करणे,कामगंध व प्रकाश सापळे यांचा प्रभावी वापर यासारखे अनेक प्रयोग ते करत असतात.कडुलिंबाचा अर्क,वर्मी वॉश,गांडूळ खत यासारख्या खतांचा अवलंब त्यांनी आपल्या शेतात केला आहे.त्यांना यापूर्वीही महाराष्ट्र शासनाने 2013 मध्ये वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्काराने गौरविले आहे.श्री.पोखरकर हे स्वतः कृषी पदवीधर असून त्यांच्या या गौरवाबद्दल अकोले तालुक्यात सर्वच थरातून कौतुक होत आहे.
