पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
राज्यात आम्ही विकास कामासाठी महायुती बरोबर आलेलो असून शाहू,फुले आंबेडकर यांचा विचार सोडणार नाही,त्यामुळे आपण सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणार आहोत.सर्व जाती धर्मासाठी वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत.राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेप्रमाणे इतर योजना लागू केल्या आहेत त्या सर्व योजना चालू ठेवण्यासाठी राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आणावे असे आवाहन राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
अकोले मध्ये जन सन्मान यात्रे निमित्त आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.जाहीर सभेपुर्वी अकोले बसस्थानक सुशोभीकरणाचे उद्घाटन,नूतन तहसील कार्यालय इमारतीला भेट,बाजारतळ लोकार्पण तर धुमाळवाडी रस्ता, उपजिल्हारुग्णालयाचे भूमिपूजन करण्यात आले.
अकोलेच्या
बाजारातळ येथे झालेल्या जाहीर सभेच्या अध्यक्ष स्थानी अगस्ति साखर कारखान्याचे चेअरमन सीताराम पा गायकर होते.यावेळी व्यासपीठावर पदमश्री राहीबाई पोपरे, आ.डॉ.किरण लहामटे, कैलासराव वाकचौरे, कपिल पवार,शरद चौधरी यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ना.अजित पवार पुढे म्हणाले की, गेल्या तीन वर्षात अकोले तालुक्यासाठी 2300 ते 2400 कोटी रुपये निधी दिला.त्यातुन झालेल्या विकास कामापैकी काही कामांचे भूमीपूजन तर काही लोकार्पण सोहळा संपन्न झाला.तालुक्यातील अनेक प्रश्न मार्गी लावली व पुढील पाच वर्षात सर्व कामे मार्गी लावू.येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला म्हणजे कमळ,धनुष्यबाण व घड्याळ चिन्हाच्या उमेदवाराला निवडून द्यावे तर अकोले मध्ये घड्याळ चिन्हावर शिक्का मारा असे सांगत एक प्रकारे आ.डॉ.किरण लहामटे यांना निवडुन आणा असे आवाहन केले.
ना.पवार पुढे म्हणाले की, राज्यात महायुती चे सरकार असून अनेक योजना राबविल्या आहेत. मी गेल्या अनेक वर्षांपासून अर्थ खाते सांभाळत असून राज्याला झेपेल अशीच कामे करतो त्यामुळे विरोधकाकडे लक्ष देऊ नका.राज्यात लाडकी बहीण योजना, तरुणांसाठी शिष्यवृत्ती ,मुलींसाठी मोफत शिक्षण, शेतकऱ्यांचे साडे सात अश्वशक्ती पर्यंतचे वीज बिल माफ,सर्व जाती धर्मासाठी विविध योजना,कांदा,तांदुळ यांच्यावरील निर्यात बंदी उठविली,साखरेला एमएसपी प्रमाणे भाव,अगस्ति कारखान्याला कर्ज उपलब्ध करून दिले,1 ऑक्टोबर पासून दुधाला 28 रुपये अधिक 7 रूपये अनुदान असे 35 रुपये भाव दिला,लाडकी लेक योजनेअंतर्गत जन्मापासून 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत 101000/- रुपये त्या मुलीला देणार,वारकरी दिंडी साठी 20000/- रुपये ,आयुष्य मान योजना,६५ वर्षापुढील महिलांना वयोश्री योजना असे अनेक योजना राबविल्या आहेत.मोदी सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला.वंदे भारत रेल्वे, मेट्रो रेल्वे सुरू केल्या असून समृद्धी मार्गामुळे आपल्या वेळेची,इंधनाची बचत झाली आहे.असे सांगत तालुक्यातील पिंपळगाव खांड धरण पाणी साठा वाढविणे,पाण्याचे फेरवाटप,बिताका चे पाणी वळविणे,पुणे शिर्डी रेल्वेचा अकोलेला थांबा,शहापूर -शिर्डी अकोले मार्गे महामार्ग,निळवंडे धरण पर्यटन विकास,अशी विविध मागण्या आपण पुढे सत्ता आल्यावर पाच वर्षात पूर्ण करू.कारण केंद्रात आपल्या विचाराचे सरकार असून त्यांच्या माध्यमातून आपण राज्यासाठी निधी आणू मात्र त्यासाठी महायुती च्या उमेदवाराला निवडून द्यावे असे आवाहन केले.
यावेळी विनय सावंत, सीताराम पा गायकर व डॉ. किरण लहामटे यांची भाषणे झाली. स्वागत व प्रास्ताविक शरद चौधरी यांनी केले तर आभार डॉ.मनोज मोरे यांनी मानले.
चौकट- राज्यात पेसा अंतर्गत भरती व्हावी म्हणून राज्यातील आदिवासी आमदार आंदोलन करीत आहे,मात्र बिगर आदिवासी युवक न्यायालयात गेल्याने न्यायालयाचा निकाल मान्य करून त्याप्रमाणे कार्यवाही करू असे स्पष्ट केले. देशाचे संविधान बदलणार असा विरोधकांनी प्रचार केला त्याचा फटका आम्हाला बसला मात्र देशाचे संविधानाला कोणीही धक्का लावू शकत नाही.आरक्षण कोणीही बदलणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
-ना.अजित पवार यांच्या सभेच्या पूर्वसंध्येला आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांनी पेसा प्रकरणी काढण्यात आलेल्या शासन आदेशाची होळी केली. महायुती सरकार विरुद्ध महात्मा फुले चौक येथे जोरदार घोषणाबाजी केली होती.आदिवासींच्या विविध प्रश्नांसंदर्भात आदिवासी संघटनांच्या काही कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याचा इशारा दिला होता.त्या पार्श्वभूमीवर कॉ. तुळशीराम कातोरे , स्वप्निल धांडे, पोपट चौधरी यांना अमित भांगरे यांच्या अकोले येथील संपर्क कार्यालयातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आदिवासी समाजातुन तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
– आदिवासी समाज हा कधीही निसर्गाच्या विरोधात जात नाही,तो निसर्गपूजक आहे.त्यांची संस्कृती, परंपरा ,लोककला,
त्यांनी जपली आहे.त्यांनी त्यांनी नेहमीच निसर्गाचा समतोल राखला आहे, महाराष्ट्र राज्याच्या विकासामध्ये आदिवासी समाजाचे मोठे योगदान आहे,ते निसर्ग पूत्र आहेत अशा शब्दात आदिवासी समाजाचा गौरव अजित पवार यांनी केला.


