पुण्य वार्ता
वीरगाव (ज्ञानेश्वर खुळे)-
खरीप हंगामात बाजरीपेक्षाही अधिक ओढ ही सोयाबीन पेरणीची असते.सरकारने हमीभाव निश्चित केल्याने उत्पन्नाची हमी मिळाल्याने अधिकचे चार रुपये पदरात पडतील हा पेरा वाढण्यामागचा उद्देश.आता सोयाबीन काढणी होऊन तयार पीक शेतक-यांच्या घरात आहे.काही बाजारात विक्रीसाठी गेले आणि लूटमार सुरु झाली.सोयाबीन पासून तयार होणारे तेल मात्र ऐन दिवाळीच्या सणात गगनाला भिडले.दिवाळी जवळ येईल त्यावेळी 40 ते 50 रुपये अधिक भाववाढ होईल हा किराणा व्यापा-यांनी अंदाज वर्तविला आहे.
सोयाबीनला 4 हजार 892 रुपये प्रतिक्विंटल अशी सरकारी हमी आहे. बाजारपेठेत गेल्यावर मात्र चार ते साडेचार हजार रुपये अशी सोयाबीनची लूट केली जाते.हमीभावापेक्षाही जवळपास पाचशे ते सातशे असा कमी बाजारभाव मिळतो.अगदी 3 हजार 700 इतका कमी बाजारभाव जाहीर केल्याने संतप्त शेतक-यांनी व्यापा-याची धुलाई केल्याची क्लिप सध्या सोशल मिडीयावर फिरते आहे.शेतक-यांची संतप्त भावना लक्षात घेता व्यापारी करीत असलेल्या लूटमारीची कल्पना येते.
शेतक-याची सोयाबीन मातीमोल मात्र सोयाबीनचे तेलाने ऐन सणाच्या काळात उचल खाल्ली.सोयाबीनला वाढीव दर मिळावा म्हणून केंद्र सरकारने तेलाच्या आयात शुल्कात 20 टक्क्यांनी वाढ केली.कच्चे सोयाबीन तेल,पामतेल आणि सुर्यफूल तेल आयातीवरही 27.50 टक्के आयात शुल्क लागू केले.त्यामुळे सोयाबीन बाजारभावात किंचित झालेली सुधारणा फार काळ टिकू शकली नाही.सोयाबीनची बाजारात आवक वाढू लागताच दर घसरले आणि तेलाच्या किंमतीने मात्र उसळी मारली.
आता दिवाळीचा सण तोंडावर येऊन ठेपला आहे.15 लिटर आणि 15 किलो सोयाबीन तेलाची आज किंमत अनुक्रमे 1 हजार 940 आणि 2 हजार 95 रुपये इतकी आहे.अजूनही 40 ते 50 रुपये प्रति लिटर भाव दिवाळीत वाढू शकतात.सरकारच्या आयात शुल्क वाढीच्या धोरणामुळे ग्राहकांना भुर्दंड सहन करावा लागला आणि शेतक-यांचाही म्हणावा असा फायदा झाला नाही.सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि तेल खरेदी करणारा ग्राहक दोघेही यात भरडले गेले.
गेल्यावर्षीच्या तुलनेत चालू वर्षी सोयाबीनच्या किमती कमी आहेत.आक्टोबर, नोव्हेंबर,डिसेंबर या तीन महिन्यांत बाजारपेठेत सोयाबीनची मोठी आवक होते.सन 2021,2022,2023 या वर्षात सोयाबीनला अनुक्रमे 5 हजार 980,5 हजार 425,4 हजार 854 असा दर मिळाला होता.शेतीच्या मशागतीपासून उत्पादन खर्चात वाढ झालेली असताना शेतक-यांनी सोयाबीन पिक मोठ्या प्रमाणावर केले.हातात आलेल्या पिकाला अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा फटका बसला.आता हमीभावापेक्षाही कमी बाजारभावाने सोयाबीन खरेदी करुन व्यापा-यांकडून शेतक-यांची आर्थिक लूट सुरुच आहे.
वास्तविक हमीभावापेक्षा कमी भावाने व्यापा-यांनी बोली लावू नये यावर सरकारने कठोर नियंत्रण ठेवायला हवे.परंतु सरकारी धोरणाने सोयाबीन विकणारा शेतकरी आणि खाद्यतेल विकत घेणारा ग्राहक दोघांचीही लूट सुरु आहे.म्हणजे कष्ट करुन पिकविलेली सोयाबीन कमी भावाने विकायची आणि त्यापासून तयार होणारे तेल मात्र उच्चांकी भावाने खरेदी करायचे हा सरकारचा दृष्टीकोन फक्त व्यापा-यांच्या हिताचा ठरतो आहे.
*सरकारची अनास्था*
---------------------
रोखीने पैसा देणारे पीक म्हणून शेतकरी सोयाबीनकडे कळले.गेल्या पाच वर्षांत या पिकाच्या क्षेत्रात सतत वाढ होताना दिसते.यंदा हे क्षेत्र पाच लाख हेक्टरने वाढले आहे.सोयाबीनवरील संशोधन,त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग यासाठी केंद्र आणि राज्यसरकारने चालना द्यायला हवी.तसे काहीही न झाल्याने सोयाबीन उत्पादक गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत.सध्या हमीभावापेक्षाही कमी बाजारभावाने सोयाबीनची खरेदी करुन शेतक-यांची लूट सुरु असताना बाजारात हस्तक्षेप करण्याची धमक सरकार का दाखवत नाही? हा प्रश्न आहे.