पुण्य वार्ता
अकोले (प्रतिनिधी):- विद्यार्थी जीवनात प्रत्येकाने एका विशिष्ट उंचीवर जाण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे , त्यासाठी गरुडा सारखी तीक्ष्ण नजर विकसित करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी केले ते येथील अगस्ति कला वाणिज्य व दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालयाच्या ४९ वे वार्षिक स्नेसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कायम विश्वस्त माजी आमदार वैभवराव पिचड होते. यावेळी व्यापीठावर संस्थेचे कायम विश्वस्त गिरजाजी जाधव, संपतराव वैद्य, मधुकरराव सोनावणे, सुरेशराव कोते,अध्यक्ष सुनील दातिर, सचिव सुधाकरराव देशमुख, धनंजय संत, कल्पनाताई सुरपुरिया, सुधाकरराव आरोटे आनंदराव नवले, रमेश जगताप, प्राचार्य भास्कर शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. म्हस्के म्हणाले की, प्रत्येकाच्या आयुष्यात संधिकाल अधिक महत्त्वाचा असतो. ज्ञानाच्या कक्षा आपल्या मेंदूत असतात शिक्षणाने त्या आधिक विस्तारात. अक्षरानेच मला इथपर्यंत पहचविले आहे. रयत शिक्षण संस्थेची सुरुवात ही खेड्या पाड्यातून झाली, राज्य देश घडविण्यात , भेदभाव नाहीसा करण्यात रयतचे योगदान खूप मोठे आहे. सध्या ज्ञान – विज्ञान – तंत्रज्ञान खूप विकसित झाले आहे आता पर्यंत यंत्र माणसाचे ऐकत होता परंतु आता माणसाला यंत्रांचे ऐकण्याची वेळ आली आहे.म्हणून नवीन तंत्रज्ञानावर टीका न करता ते आत्मसात करा आसा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

अध्यक्षीय भाषणात वैभवराव पिचड म्हणाले की, १९७२ च्या दुष्काळात तालुक्यातील तत्कालीन धुरिणांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून रोजगार हमी योजनेच्या कामगारांकडून एक एक रुपया जमा करून या शिक्षण संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या व महाविद्यालयाच्या जडण – घडणीत तालुक्यातील जनतेचा मोठा वाटा आहे . प्राध्यापकांच्या कठोर परिश्रमातून महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर पडली आहे. येणाऱ्या काळात ज्याच्या जवळ ज्ञान आहे तोच खरा धनवान असेल म्हणून विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धांमध्ये सहभागी झाले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. या वर्षीचा स्टुडंट ऑफ दी इयर हा पुरस्कार वरिष्ठ महाविद्यालयातील नयन पवार याला तर कनिष्ठ विभागात ईश्वरी भोसले या विद्यार्थिनीला प्रदान करण्यात आला. माई मंगेशकर स्मृती पुरस्कार करिश्मा मधे, क्रीडा पुरस्कार श्रीराम सांगळे , उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार रवींद्र कदम यांना देण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर शेळके यांचे चिरंजीव कै. डॉ. अविनाश शेळके यांचे स्मृतीप्रीत्यर्थ डॉक्टर्स डे निमित्त रू.२१००० च्या कायम ठेवीच्या व्याजातून उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सन्मानपूर्वक सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ भास्कर शेळके यांनी, स्वागत संस्थेचे अध्यक्ष सुनील दातीर यांनी केले तर सचिव सुधाकरराव देशमुख यांनी श्रद्धांजली ठराव मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. महेजबिन सय्यद, डॉ.नितीन आरोटे, प्रा.संदेश कासार, प्रा.कामराज जाधव यांनी केले तर आभार डॉ.साहेबराव गायकवाड यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ. पंकज नाईकवाडी , प्रा.गुलाब देशमुख सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

