पुण्य वार्ता
ब्राम्हणवाडा (प्रतिनिधी): जम्मू-काश्मीरमधील तिसवाड सेक्टरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी सर्च ऑपरेशनदरम्यान शौर्याने लढत वीरमरण पत्करलेल्या अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावचे सुपुत्र शहीद संदीप पांडुरंग गायकर (वय ३२) यांचे २४ मे रोजी त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस व दैनिक समर्थ गांवकरी चे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांनी अगस्ती सहकारी साखर कारखाना, अकोले संचालक बाळासाहेब नाईकवाडी यांच्यासोबत शहीद संदीप गायकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी त्यांनी शहीद संदीप गायकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. गावकरी आणि नातेवाईकांशी संवाद साधताना डॉ. आरोटे म्हणाले, “शहीद संदीप यांनी देशासाठी दिलेले बलिदान अमूल्य असून त्यांचे शौर्य सदैव स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आपण सर्वजण आहोत.”
यावेळी ग्रामस्थांनीही डॉ. विश्वासराव आरोटे व नाईकवाडी यांचे उपस्थितीसाठी आभार मानले. शहीदाच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी अनेक मान्यवरांची भेट सतत सुरू आहे. देशभक्तीच्या या प्रेरणास्त्रोताला गावकऱ्यांकडूनही सलाम करण्यात येत आहे.
