पुन्य वार्ता
*वीरगाव(ज्ञानेश्वर खुळे)*--
अकोले तालुक्यातील वीरगावात दोघांवर प्राणघातक हल्ला करुन बछड्यासाठी सैरभैर झालेली बिबट्याची मादी 36 तासानंतरही पिंज-यात अडकली नाही.बस्तीराम रामचंद्र गांगड आणि माधव पोपट देशमुख यांचेवर प्राणघातक हल्ला करुन संदीप लक्ष्मण वाकचौरे, सार्थक संदीप वाकचौरे यांचेवरही या बिबट्याने हल्ल्याचा प्रयत्न केला होता.वीरगावचे ज्येष्ठ पत्रकार आण्णासाहेब थोरात यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेमार्फत गावक-यांना सावध केल्यानंतर सगळे सतर्क झाले.
शुक्रवारी सकाळी 7 वा.च्या दरम्यान हे हल्ले झाल्यानंतर वन अधिकारी सचिन धिंदळे आणि वनपाल पंकज देवरे यांचे मार्गदर्शनाखाली वनखात्याचे सर्व अधिकारी,कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर संबंधित शिवारात तीन पिंजरे लावण्यात आले.दरम्यानच्या काळात बाळासाहेब कडलग यांचे गवतात आढळून आलेला बछडा बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंज-यात ठेवण्यात आला.
शुक्रवारी रात्रभर वनखात्याचे अधिकारी,कर्मचारी यांनी जागते राहून या पिंज-यावर कॅमे-याच्या सहाय्याने पाळत ठेवली.बछड्याचा आवाज ऐकून बिबट्याची मादी रात्रभरात तब्बल 50 वेळा पिंज-याजवळ आल्याचे कॅमे-यात कैद झाले.पिंज-याजवळ या मादीने माती मोठ्या प्रमाणात उकरुन काढली.पिंज-यात मात्र तिने प्रवेश केला नाही.त्यामुळे आजची शनिवारची रात्रही शिवारातील शेतकरी आणि वनखात्याचे दृष्टीने जाणत्या पहा-याचीच असणार आहे.
पिंज-यातील बछडा बिबट्याच्या मादीला मिळून न आल्यास ती अधिक सैरभैर आणि आक्रमक होण्याची शक्यता आहे.आजच्या शनिवारच्या रात्री तरी बछड्याच्या प्रेमापोटी या बिबट्याच्या मादीने पिंजरा प्रवेश केल्यास सारेच जण सुटकेचा श्वास सोडतील.तोपर्यंत मात्र शिवार धास्तावलेलाच राहील.वन अधिकारी सचिन धिंदळे आणि वनपाल पंकज देवरे हे चोवीस तास परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.
सतर्क ग्राम सुरक्षा यंत्रणा
--------------------
बिबट्याने हल्ला केल्यानंतर काही क्षणात ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या भ्रमणध्वनीवरून ही माहिती पत्रकार आण्णासाहेब थोरात यांनी गावक-यांना दिली.त्यामुळे सर्व ग्रामस्थ सावध झाले.पालकांनी आपल्या पाल्यांना स्वतः शाळेत आणून सोडले.थोरात यांनी ही माहिती खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि आमदार डॉ.किरण लहामटे यांना दिली.वनखात्याचीही यंत्रणा तात्काळ हलली.गावातील शालेय विद्यार्थी शुक्रवारी दुपारी चार वाजताच सोडून देण्यात आले.या परिसरातील रस्ता वनखात्याने बंद केला होता.शुक्रवारी आणि शनिवारी हे दोन्ही दिवस वनखात्याचे अधिकारी, कर्मचारी शिवारात ठाण मांडून आहेत.

