पुन्य वार्ता
अकोले तालुक्यातील निळवंडे धरण ते अकोले तालुक्याच्या अंतिम हद्दिपर्यंत असणाऱ्या कॅनॉल ला सुटलेल्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी अकोले तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुशांत आरोटे यांनी केली आहे.
अकोले तालुक्यातील निळवंडे धरणामुळे काहींच्या आयुष्यात सुख तर धरण ग्रस्त व कॅनॉल ग्रस्त शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दुःखाची किनार स्पष्ट दिसत आहे. निळवंडे धरणातून कॅनॉल ला सुटलेल्या आवर्तनामुळे अनेक आदिवासी व बिगर आदिवासी शेतकऱ्यांच्या पिकांत कॅनॉल गळतीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरांत पाणी घुसले आहेत.जनावरांचे देखील हाल होत आहेत. सदर भागातील शेतकऱ्यांच्या आरोग्याचे देखील प्रश्न उद्भवत आहेत. हातातोंडाशी आलेली पिके डोळ्यांदेखत खराब होऊ लागली आहे.मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रशासकीय अधिकारी फक्त नुकसान ग्रस्थ भागाला भेटी देण्याचे सोपस्कार पार पाडत आहेत. पण कारवाई मात्र काहीही होताना दिसत नाही. अनेक वेळा ह्या भागातील शेतकऱ्यांनी आंदोलने केली आहेत,प्रसंगी कॅनॉल मध्ये प्रवेश केले आहेत तरी देखील प्रशासन शासन धिम्म असल्याचे दिसून येते आहे. अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान त्यांची होणारी हाल ना प्रशासनाला दिसत आहे आणि नाही राजकारणापाई शासनाला दिसत आहे. शासनाने मोठा संघर्ष उभा राहण्याच्या आत शेतकऱ्यांचा अंत न पाहता तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. बाकी तुमचे काही सोपस्कार त्या कॅनॉल बाबत राहिले असतील ते नंतर पार पाडा त्यावर काय निर्णय घ्यायचे काय उपाययोजना करायच्या त्या करा पण तत्पूर्वी तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी.
सर्वच लोकप्रतिनिधींनी.व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील,आमदार डॉ किरण लहामटे,शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, जि प सदस्य, पंचायत समिती सदस्य, आदींनी ह्या गंभीर प्रकरणात लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी कॅनॉल ग्रस्त शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटना अकोले तालुका अध्यक्ष सुशांत आरोटे,उपाध्यक्ष सुनील पुंडे,कार्याध्यक्ष सुनील उगले टेलर, शुभम आंबरे, सोमनाथ आहेर,प्रवीण आहेर शेतकऱ्यांनी केली आहे.
चौकट
अकोले तालुक्यातील निळवंडे कॅनॉल ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. सदर नुकसान होणाऱ्या भागात कायमस्वरूपी उपाययोजना करावी. जर प्रशासन किंवा शासनाने ह्या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष केले तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यास प्रशासन जबाबदार राहील. शेतकऱ्यांच्या सोबत स्वाभिमानी शेतकरी संघटना भक्कम उभी राहील.
सुशांत आरोटे
तालुकाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना अकोले
