पुन वार्ता
अकोले (प्रतिनिधी)
नुकत्याच दहावी, बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत. जूनमध्ये पुढील शिक्षणाची पालकांना तयारी करावी लागते. प्रवेशासाठी अनेक प्रकारच्या दाखल्यांची गरज असते. परंतु ऐन निकाल लागल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा आताच दाखले काढून ठेवल्यास जूनमध्ये ताटकळत राहण्याची वेळ येणार नाही. एप्रिल पासूनच विविध दाखले काढून ठेवण्याची मानसिकता पालकांनी ठेवावी असे आवाहन प्रांताधिकारी विशाल यादव तहसिलदार डॉ. सिद्धार्थकुमार मोरे यांनी केले आहे
दहावी बारावीची परीक्षा दिलेल्या पाल्यांच्या पुढील शिक्षणाचे नियोजन आधीच झालेले असते. परंतु त्यासाठी आवश्यक दाखले काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात याची माहिती करून घेण्याचे बहुतांश पालकांचे दुर्लक्ष असते . जूनमध्ये प्रवेश सुरु झाल्यानंतरच दाखले काढण्यासाठी रांगा लागतात.
कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी कसरत करावी लागते. दहावी बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी उत्पन्न दाखला, डोमसाईल, नॅशनेलेटी, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलर लेअर, आरक्षण नसलेल्या जातीसाठी इडब्लूएस प्रमाणपत्र, शेतकरी दाखला, अल्पभूधारक दाखला आदी दाखल्याची गरज असते. त्यासाठी आवश्यक दाखल्याची जुळवाजुळव करण्याची कसरत करावी लागते. त्यासाठी तहसीलदार अकोले यांनी सर्व दाखल्याची आवश्यक कागदपत्रांची माहिती सर्व सेतु चालक आपले सरकार केंद्र चालकांना दर्शनीय भागात लावण्याच्या सुचना केल्या आहेत.
——–!
दोष मात्र प्रशासकीय यंत्रणेलाच
जुनमध्ये दाखले काढण्यासाठी गर्दी वाढल्याने दाखले मिळणे मुश्किल होते. त्यामुळे पालक एजंटच्या जाळ्यात अडकतात व एजंट मागेल ते पैसे देतात व दाखलेही वेळेत मिळत नाहीत.म्हणून पालक ह्याचा दोष प्रशासकीय यंत्रणेलाच देतात. हे घडू नये म्हणून आत्ताच आपले दाखले काढून ठेवण्याचे आवाहन प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी केले आहे.
