पुण्य वार्ता
मुख्य संपादक
छोटासा परिचय कै. मारुती कारभारी नवले. कृषी अधिकारी नासिक सन 1969 साली मालदाड, ता- संगमनेर या छोट्याशा गावी मारुती कारभारी नवले यांचा जन्म झाला, आपले प्राथमिक शिक्षण मालदाड या गावी तर माध्यमिक शिक्षण सह्याद्री विद्यालय संगमनेर या ठिकाणी घेत असताना सन 1982 साली वडील कै. कारभारी किसन नवले यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले,लहानपणीच पितृछत्र हरपल्यानंतर आई गं. भा. नर्मदाबाई,आजी चांगुनाबाई व आजोबा कै. किसन दादा नवले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाचे बाळकडू मिळाले.आजोबांची साधी राहणी पण उच्च विचारसरणीने त्यांनी कुटुंबाला प्रामाणिकपणा, मेहनत,चिकाटी आणि जिद्द या गोष्टींमुळे कुटुंबाची प्रगती झाली. त्याकाळी कुटुंबात मेंढी पालन व्यवसाय देखील होता, शेती व्यवसायाला याची जोड यांनी मोठ्या हिमतीने कुटुंब घडविले. मुलांच्या शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. व वडिलांचा वारसा पुढे चालविला.
भाऊ श्री. बाबासाहेब कारभारी नवले (बाबाजी आण्णा) सामाजिक क्षेत्रात काम करत असून सुरुवातीपासूनच समाजसेवेची आवड असल्यामुळे श्री क्षेत्र नारायणपूर पायी दिंडी, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर दिंडी, श्री क्षेत्र आळंदी दिंडी, मालदाड ते श्री क्षेत्र मढी पायी दिंडी सोहळ्यामध्ये मोठा सहभाग असतो. दिंडी सोहळा म्हटले की, कमिटीची बैठक, रथ सजावट, स्वयंपाकासाठी लागणारी भांडी, किराणा बाजार, डफकरी यांची डफांची दुरुस्ती देखभाल, कानिफनाथ महाराजांच्या काठी मिरवणुकीसाठी लागणारी गलप, विद्युत रोषणाई,पूजा पाठ, हनुमान मंदिर सप्ताह, कानिफनाथ मंदिर काकडा, मच्छिंद्रनाथ मंदिर सप्ताह, महादेव मंदिर यात्रा, कानिफनाथ महाराज यात्रा, गावातील दहावे- तेरावे, लग्न समारंभ या व अनेक सार्वजनिक तसेच वैयक्तिक आणि शैक्षणिक क्षेत्रात बाबाजी अण्णा यांचा मोठा सहभाग आहे. गावातील सर्वच क्षेत्रात तळमळीने सहभाग असल्याने सर्वजण त्यांना प्रेमाने “बाबाजी आण्णा ” यांना या नावाने ओळखतात.
आण्णांना सौ. मंगल सुनील गुंजाळ व कु. सिद्धी या दोन मुली आहेत.
नाशिक जिल्ह्यात वणी, दिंडोरी,कळवण, घोटी, इगतपुरी, कावनाई ह्या ठिकाणी कृषी विभागाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत, शेतीच्या बांदावर जाऊन यशस्वीपणे राबविल्या.
उदा. फळबाग योजना, नालाबंडिंग, शेततळे, ठिबक सिंचनाचे महत्व शेतकऱ्यांना पटवून दिले, बांदावरच्या वृक्ष लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त केले. हे सर्व करत असताना प्रामाणिकपणा, मेहनत, जिद्द, कार्यक्षमपणे, हजरजबाबी या सर्व गोष्टी करत असताना गावोगावी शेतकरी सहली आयोजन केले,हे सर्व करत असताने शेतकरी जोडला जात होता. आपल्या कार्याकुशलतेने व प्रेमळ स्वभावाने कृषी क्षेत्रातील उच्च पदस्थ अधिकारी यांच्याशी मैत्रीचे सबंध जोडले गेले. नाशिक विभागात मोठा मित्रपरिवार जोडला गेला.
हे सर्व करत असताना त्यांना मोलाची साथ मिळत होती ती धर्मपत्नी योगिता यांची. त्यांना दोन मुली असून कु. श्रावणी ही आर्टिफिशियल इंजीनियरिंग चे शिक्षण घेत आहे. दुसरी मुलगी ऋचा ही इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेत आहे.
उभयतांनी मुलगी व मुलगा असा भेदभाव न मानता मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले.
ऐन उमेदीत हसता खेळता परिवार नावा- रूपाला आलेला असताना मारुतीराव नवले अचानक आजारी पडल्याने त्यांना नाशिक येथील अपोलो हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. उपचार घेत असताना कृषी क्षेत्रातील मोठा मित्रपरिवार,नातेवाईक, कुटुंबातील व्यक्ती दररोज तब्येतीची विचारपूस करत होते, भेटत होते. अशाही परिस्थितीत भेटीसाठी येणाऱ्या प्रत्येकाच्या तब्बेतीची विचारपूस करून घेण्याचा सल्ला देत होते, मी ठीक आहे, कशासाठी एवढा त्रास घेतला, अश्या प्रकारे सर्वांची मनधरणी करत होते.
काही दिवसानंतर त्यांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला. व त्यानंतर काही दिवस सेवेत पुन्हा रुजू झाले. त्याचवेळी 2024 लोकसभा निवडणुकीची ड्युटी करणे भाग पडले यामुळे त्यांना मोठी दगदग झाली. आणि पुन्हा त्यांना त्रास होऊ लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आणि त्याचवेळी उपचारादरम्यान आपल्या बंधूंशी बोलत असतानाच मंगळवार दिनांक 03 सप्टेंबर 2024 सायंकाळी चार वाजून 35 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.
कुटुंबावर व परिसरात मोठी शोककळा पसरली.
