पुण्य वार्ता
अकोले (प्रतिनिधी)- अकोले तालुक्यातील सर्व क्षेत्रात झालेल्या निर्मिती मध्ये माजी मंत्री स्व.मधुकरराव पिचड यांचे शिवाय अन्य कोणाचेही योगदान नाही, तालुक्यात पाण्याची उपलब्धता ही माजी मंत्री पिचड यांचे मुळेच झाली.
अशा आशयाची मनोगते विविध नेते व कार्यकर्त्यांनी व्यक्त करत स्व.पिचड यांच्या विविध आठवणींना उजाळा दिला. निळवंडे धरणाच्या निर्मिती मध्ये माजी मंत्री पिचड यांचे मोठे योगदान असल्याने त्यांचे नाव निळवंडे धरणाला द्यावे असा ठराव या सर्व पक्षीय अभिवादन सभेत करण्यात आला. या ठरावास सर्व उपस्थित मान्यवर व नागरिकांनी पाठींबा दिला.
माजी मंत्री स्व. मधुकरराव पिचड यांचे एक महिन्यापूर्वी दुःखद निधन झाले. त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अकोले तालुक्यातील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते यांचे वतीने अकोले महाविद्यालयात शोकसभा आयोजीत करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ शेतकरी नेते दशरथराव सावंत होते.
यावेळी माजी मंत्री स्व.मधुकरराव पिचड यांच्या सान्निध्यात आलेल्या अनुभवांचा आढावा घेताना स्व.मधुकरराव पिचड हे क्षमाशील व्यक्तीमत्व होते. त्यांनी तालुक्यात लोकशाही जीवंत ठेवली. त्यांनी कधीही व्यक्तिगत द्वेष ठेवला नाही.पिचड कुटुंब हे कधीही कोणासाठीही उपद्रवी झाले नाही. प्रशासनावर वचक असणारा नेते म्हणजे पिचड साहेब होते. पिचड साहेब हे शारीरिक उंचीने कमी होते मात्र कर्तृत्वाने ते कळसुबाई शिखरपेक्षा मोठे होते. त्यांनी अकोले तालुक्यात कायम जातीय सलोखा ठेवण्यासाठी प्रयत्न केले.अकोले तालुक्यातील विकासासाठी राज्यात धोरणे घेणारा नेता पुन्हा होणे नाही. त्यांच्या अंत्यविधीला राज्यातील तर दशक्रिया विधीला देशातील अनेक नेते उपस्थित राहून त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली ही बाब पिचड साहेब यांची राजकीय उंची लक्षात येते, आजच्या राजकीय घडामोडीत जनता लोकप्रतिनिधींना पाच वर्षात कंटाळताना दिसत आहे मात्र सलग 40 वर्षे माजी मंत्री पिचड साहेब यांच्या सोबत राहिली आहे ही बाब पिचड साहेब यांच्या कर्तुत्वाला सलाम म्हणावा लागेल अशी भावना व्यक्त केली.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड कारभारी उगले यांनी ६० वर्षाहून अधिक काळ राजकीय, सामाजिक जीवनात स्व. मधुकरराव पिचड यांचा संपर्क आला. राजकीय दृष्ट्या आमचे कधी पटले नाही पण त्यांनी कधीही संबंधात कटूता येऊ दिली नाही, अशा उंचीचा माणूस पुन्हा होणे नाही असे सांगतानाच स्व. पिचड यांची सर्व प्रथम अभिवादन सभा आयोजित करून तालुक्यातील पत्रकारांनी जी संवेदनशीलता दाखवुन आम्हा राजकारण्यांना जी चपराक दिली.त्यानंतर ही अभिवादन सभा घेण्याचे ठरले असे त्यांनी सांगितले.
या सभेच्या प्रास्ताविकात आर पी आय चे नेते विजयराव वाकचौरे यांनी स्व.पिचड यांचा जीवनपट उलगडून सांगितला.
यावेळी जे.डी. आंबरे, भाऊपाटील नवले, परबतराव नाईकवाडी, शरदराव देशमुख, वकील वसंतराव मनकर, शरद चौधरी, यशवंत आभाळे, सीताराम देशमुख, सीताराम भांगरे, उमेश डोंगरे, भानुदास तिकांडे, अरुण रुपवते, माधवराव तिटमे, मारुती मेंगाळ, प्रा.विवेक वाकचौरे, अर्शद तांबोळी आदींनी मनोगते व्यक्त करत स्व. मधुकरराव पिचड यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला.
या प्रसंगी तालुक्यातील विविध राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते,अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कायम विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य,प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी प्रा डॉ.नितीन आरोटे व प्रा.विवेक वाकचौरे यांनी सूत्रसंचलन केले. अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर यांनी आभार मानले.
चौकट-अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी विश्वस्त ,माजी मंत्री स्व.मधुकरराव पिचड यांचे योगदान पुढील पिढीला माहीती व्हावे म्हणून अगस्ति महाविद्यालय येथे मधुकरराव पिचड यांनी केलेल्या कार्याचे कायम स्मरण होण्याच्या दृष्टीने संग्रहालय व स्व .पिचड यांचा अर्ध पुतळा उभारण्यात येणार असल्याचे अध्यक्ष सुनील दातीर यांनी सांगितले.

