पुन्य वार्ता
मुंबई:
महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकारांसाठी मोठी आनंदवार्ता आहे. राज्य सरकारने ज्येष्ठ पत्रकारांसाठी मिळणाऱ्या सन्माननिधीत मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच घोषणा केली की, १ एप्रिल २०२५ पासून ज्येष्ठ पत्रकारांना २० हजार रुपये सन्माननिधी दिला जाईल. सध्या हा सन्माननिधी ११ हजार रुपये असून या निर्णयामुळे पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार संवाद यात्रेचे हे फलित आहे. नागपूर येथून सुरू झालेल्या या संवाद यात्रेची सांगता मंत्रालय, मुंबई येथे झाली. या यात्रेचे आयोजन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री. वसंत मुंडे आणि राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
संवाद यात्रेत सहभागी पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,
पत्रकार संवाद यात्रेला महाराष्ट्रभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. यामध्ये दैनिकांचे संपादक, विक्रेते, प्रतिनिधी, वरिष्ठ पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले. मंत्रालयात आयोजित समारोप सोहळ्याला चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, मंगल प्रभात लोढा यांसारख्या मान्यवरांसह सरकारच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली होती. यावेळी पत्रकार संघाने आपल्या मागण्या सरकारपुढे ठामपणे मांडल्या होत्या.
सरकारचा सकारात्मक प्रतिसाद,
पत्रकारांच्या मागण्यांवर विचार करून राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली. दोन आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय याच संवाद यात्रेच्या निमित्ताने घेतला गेला. त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकारांसाठी मिळणाऱ्या सन्माननिधीत वाढ करण्याचा प्रस्तावही मंजूर झाला.
हा सन्माननिधी वाढीचा निर्णय २०२४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला होता, परंतु त्याची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घोषणेला गती देत १ एप्रिल २०२५ पासून अंमलबजावणी होईल असे ठाम आश्वासन दिले आहे.
पत्रकारांमध्ये समाधानाचे वातावरण,
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ज्येष्ठ पत्रकारांमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे या यशात मोठे योगदान असून, हा निर्णय पत्रकारांसाठी अभिमानास्पद आहे.
यापुढील काळात पत्रकारांच्या हितासाठी आणखी सकारात्मक पावले उचलण्यात येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या निर्णयाने पत्रकारांच्या प्रलंबित मागण्यांना न्याय मिळाला असून पत्रकार संघाने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे.
✍🏻डॉ. विश्वासराव आरोटे कळसुबाई शिखरावरून

