पुन्य वार्ता
प्रतिनिधी :
ब्राम्हणवाडा (ता. अकोले) :
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही वनवे जाणीवपूर्वक किंवा नैसर्गिकरीत्या पेटत आहेत. मागील दोन-तीन दिवसांपासून ब्राम्हणवाडा परिसरातील डोंगराळ भागात आणि जंगलात भीषण आग लागली असून त्यामुळे डोंगर काळवंडले असून जंगल जळून बेचिराख झाले आहे.
ब्राम्हणवाडा ते ओतूर रस्त्यावरील शिंदेवाडी, पिराचीवाडी परिसरात दोन दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणावर वनवा भडकला. ही आग इतकी भीषण होती की दोन दिवस रात्रंदिवस अखंडपणे धग धगत होती. या आगीत शेतकऱ्यांची पाण्याच्या पाइपलाइन, तळ्यांचे कागदपत्रे, विहिरीवरच्या मोटारींच्या पाइपलाइन, विद्युत केबल्स यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्याचबरोबर लाखोंच्या वनसंपत्तीचा आणि असंख्य वन्य प्राण्यांचा देखील नाश झाला आहे.
वन अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष – जबाबदार कोण?
वनवा भडकत असताना परिसरातील शेतकऱ्यांनी तातडीने वन अधिकारी सुजाता टेमरे मॅडम यांना फोनद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या कडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. आज दैनिक “समर्थ गांवकरी” च्या प्रतिनिधींनीही टेमरे मॅडम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन उचलला गेला नाही.
यानंतर आम्ही फॉरेस्ट ऑफिसर अकोले, आनंदा पाटील यांच्याशी संवाद साधला असता त्यांनीदेखील समाधानकारक उत्तर देण्याचे टाळले. उलटपक्षी, “याच्याशी आमचा कोणताही संबंध नाही” असे सांगत जबाबदारी झटकली.
या प्रकारामुळे सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लाखो रुपयांची वनसंपत्ती जळत असताना प्रशासन आणि वनखाते निष्क्रीय कसे राहू शकते? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
दरवर्षीची पुनरावृत्ती, परंतु उपाययोजना नाही:
दरवर्षी याच परिसरात वनवे लागत असताना अद्यापही वन खात्याने त्यावर ठोस उपाययोजना केल्या नाहीत.
अधिकाऱ्यांचे उत्तर असते की आग लागलेली जमीन खासगी असल्याने वन खात्याचा संबंध नाही.
मात्र, वनसंपत्ती ही सार्वजनिक मालमत्ता असल्याने तिच्या संरक्षणाची जबाबदारी वनखात्याचीच आहे.
शासनाने यावर गंभीरपणे विचार करून दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली पाहिजे, अशी जोरदार मागणी होत आहे.
शेतकऱ्यांची भूमिका देखील संशयास्पद:
परिसरातील काही शेतकऱ्यांकडून रान पेटवण्याची चुकीची पद्धत अजूनही सुरू आहे. त्यांना वाटते की, जंगल पेटवल्यास चांगले गवत उगवते आणि जनावरांना चारा मिळतो. मात्र, त्यांच्या या चुकीच्या समजुतीमुळे आग आटोक्यात राहात नाही आणि संपूर्ण जंगल पेटते.
या आगीत फक्त वनस्पती संपत्तीच नाही तर असंख्य पक्षी, साप, छोटे प्राणी यांचेही जीवित नुकसान होते. त्यांच्या घरटी, बिळे जळून जातात. पर्यावरणाचा समतोल बिघडतो.
ग्लोबल वॉर्मिंगचा वाढता धोका:
आज जगभर ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढत असताना आपण झाडे जाळून भविष्यासाठी आणखी मोठे संकट निर्माण करीत आहोत.
उन्हाच्या वाढत्या तीव्रतेने, कमी पर्जन्यमानामुळे आणि नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीसुद्धा धोक्यात येते.
आपण उन्हाळ्यात झाडाच्या सावलीसाठी आसुसतो, पण त्याच झाडांचे रक्षण करण्यात मात्र निष्काळजीपणा करतो.
आता तरी जागे व्हा!
शेतकरी, नागरिक आणि प्रशासन या तिन्ही घटकांनी आता एकत्र येऊन गंभीरपणे विचार केला पाहिजे.
जाणीवपूर्वक रान पेटवणे थांबवले पाहिजे. वनसंपत्तीचे रक्षण करण्यासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करणे गरजेचे आहे.
वन खात्यानेही केवळ जबाबदारी झटकणे थांबवून सजगता दाखवावी.
जर यावर आज उपाययोजना केल्या नाहीत, तर उद्या आपल्याच हातून आपले पर्यावरण, आपली शेतजमीन, आपले जीवन उद्ध्वस्त होईल.

